भारतरत्न व मा. राष्ट्रपती डॉ.जाकीर हुसेन व अब्दुल गफ्फार खान यांना मोहंमदिया सोसायटी तर्फे अभिवादन
नगर - भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ.जाकीर हुसेन यांचं असं मत होतं की परमेश्वराची मानवावर सर्वात मोठी कृपा ही आहे की, त्याला बुद्धी दिली. त्या बुद्धीचाच करिश्मा आहे की, मानव आज चंद्रावर जाऊ शकतो व इतर ग्रहांवर पण पोहचत आहे. समुद्राच्या तळाखाली पोहचत आहे. तर जगातल्या अशक्य कामांना शक्य करण्याचे काम मानवी बुद्धी करत आहे. बुद्धीला जागृत करण्याचा काम शिक्षण करते. शिक्षणामुळे मानवी जीवन उत्तम घडत असते व मानवी विचार सरणी बदलत असते, त्यामुळे अवगुण कमी होतात व मानव काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा युवकांनी जास्तीत जास्त वाचन करुन उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन मोहंम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर यांनी केले.
माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.जाकीर हुसेन व सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान यांच्या जयंतीनिमित्त मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मुकुंदनगर येथे संस्थेच्या मौलाना आजाद उर्दू गर्ल्स हाईस्कूल, सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळा, मासुमिया अध्यापक विधालय, मदर टेरेसा उर्दू ज्युनियर कॉलेजच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजी वाहून त्यांच्यासाठी दुवा करण्यात आली.. याप्रसंगी सलाम सर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद,सईद सर,हसिब शेख आदि उपस्थित होते.
सलाम सर पुढे म्हणाले, जाकीर हुसेन यांनी शिक्षणाच्या आधारे 1957 साली बिहारचे राज्यपाल झाले व पुढे 1967 साली भारताचे राष्ट्रपती या सर्वोच्चपदी विराजमान झाले. भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न ही त्यांना मिळाला, अशा या थोर कर्तुत्वान व्यक्तीमत्वास फक्त अभिवादन न करता आपणही उच्च शिक्षण घेण्याचा मानस करुन भरपुर शिक्षण घेऊन खरी आदरांजली अर्पण करु शकतो.
यावेळी आबीद दुलेखान यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलमीज सय्यद यांनी केले. प्रास्तविक फरीदा जहागीरदार यांनी केले तर आभार अंजुम खान यांनी मानले.
