अपमानजनक वक्तव्ये करून मराठ्यांविषयी इतर जातींच्या मनात द्वेष पेरत आहे : धनंजय कानगुडे

अपमानजनक वक्तव्ये करून मराठ्यांविषयी इतर जातींच्या मनात द्वेष पेरत आहे : धनंजय कानगुडे

अहमदनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये करून मराठ्यांविषयी इतर जातींच्या मनात द्वेष पेरत असल्याचा आरोप जाती जोडो अभियानचे संयोजक धनंजय कानगुडे यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. कानगुडे यांनी म्हटले आहे की खराडी पुणे येथे सोमवारी (दि. २०) मराठा आरक्षणाबाबत सभा पार पडली. सभेत आरक्षणाविषयी बोलताना श्री. जरांगे म्हणाले की 'लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आमच्या लेकरांना काम करावे लागते'. आरक्षित प्रवर्गात अनुसूचित जाती-जमाती व कुणबी प्रमाणपत्र धारक मराठा-कुणब्यांसह इतर मागास जातींचा समावेश आहे. या सर्वांची लायकी जरांगे यांनी जाहीर सभेत काढली.


राज्यातील कुणबी-मराठा शिव-शाहू छत्रपतींचे विचार मानतो. शिवरायांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन रयतेचे राज्य उभारले. शाहू महाराजांनी संधीपासून वंचित बहुजनांना आरक्षण दिले. श्री. जरांगे शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बोलायला सुरुवात करतात. मात्र त्यांची भाषा सरंजामी वतनदारांची आहे.

सर्व मराठा कुणबी आहेत, या जरांगे यांच्या भूमिकेशी जाती-जोडो अभियान सहमत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र असतानाही मराठवाड्यातील मराठा बांधवांना प्रमाणपत्र मिळवण्याच्या आंदोलनात ते तन-मन-धनाने सहभागी आहेत. मात्र आरक्षित जातींची लायकी काढून श्री. जरांगे यांनी त्यांना सहकार्य करणाऱ्या कुणबी बांधवांचाही उपमर्द केला आहे. नाव शिवरायांचे आणि मनोवृत्ती सरंजामी वतनदारांची, असा दुटप्पीपणा शिव-शाहू छत्रपतींचे अनुयायी मान्य करणार नाहीत. सामान्य कुणबी-मराठा या विचारांशी सहमत नाही. जाती-जोडो अभियान या वक्तव्याचा निषेध करत आहे.

आरक्षित प्रवर्गाचे लोक लायक नाहीत, असं जरांगेंचं मत असेल तर मराठ्यांना आरक्षण कशासाठी मिळवून देत आहेत?

राज्यात सध्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे व छगन भुजबळ यांचा कलगीतुरा रंगला आहे. मूळ मुद्दा बाजूला ठेवून ते एकमेकांवर व्यक्तिगत शेरेबाजी करत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या समर्थकांच्या मनात द्वेषाची पेरणी होत आहे. छगन भुजबळ स्वतः मंत्री आहेत. जातवार जनगणनेची मागणी ते मंत्रिमंडळ बैठकीत करू शकतात. मात्र अंबड येथील सभेत तोंडदेखली मागणी करून ते शांत बसले. जातवार जनगणना करणार नाही, असं केंद्र सरकारने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले आहे. मात्र भुजबळ त्याकडे दुर्लक्ष करून तोंडदेखली मागणी करतात. त्यापेक्षा जास्त वेळ ते जरांगेंवर व्यक्तिगत शेरेबाजी करण्यासाठी देतात. यावरून मूळ मुद्याशी त्यांची बांधिलकी किती आहे, हे स्पष्ट होते.

जनतेने तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहून सामाजिक सलोखा कायम राखावा. तसेच आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या जातवार जनगणनेसाठी मराठ्यांसह इतर मागास तसेच अनुसूचित जाती-जमातींनी एकत्रितपणे प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!