समाजातील शेवटच्या घटकांसाठी झटणाऱ्या हातांना बळ देण्याचे परिषदेचे कार्य -सपोनि. कल्पना चव्हाण
स्नेहालयाच्या उडान प्रकल्प व बालभवनच्या स्वयंसेविकांना पावसाळी किटची भेट
नगर (प्रतिनिधी)- बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि शहराच्या झोपडपट्टी भागात शिक्षणातून पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या बालभवन मध्ये कार्यरत महिला स्वयंसेविकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदच्या वतीने रेनकोटसह पावसाळी किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तोफखाना पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख,उडानचे व्यवस्थापक प्रवीण कदम, बालकल्याण समिती सदस्य ॲड.अनुराधा येवले, बालभवन प्रकल्पाच्या व्यवस्थापक पिका उषा खोलम, मुक्तीवाहिनीचे समन्वयक शाहीद शेख व नवेद शेख आदींसह उडान व बालभवनच्या महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या.
सपोनि. कल्पना चव्हाण म्हणाल्या, समाजातील शेवटच्या घटकांसाठी झटणाऱ्या हाताला बळ देण्याचे कार्य मराठी पत्रकार परिषद हे करीत आहे. समाजामधील प्रश्न मांडत असताना सामाजिक संवेदना जागरुक ठेवून त्यांना मदतेचे हात सतत पुढे करण्याचे कार्य पत्रकारांचे अभिमानास्पद आहेत. फक्त प्रश्न मांडून न थांबता प्रश्न तडीस लावण्याचे कार्य केले संघटना करत आहे. यापूर्वी हि महिलादिनानिमित्त कार्यक्रमास सहभागी होवून मिळालेला सन्मान आठवणीत असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
विजयसिंह होलम यांनी सर्वच प्रश्न शासकीय यंत्रणेद्वारे सुटू शकणार नाही. यासाठी समाजात उतरुन या प्रश्नासाठी लढाई करावी लागणार आहे. स्नेहालय संचलित उडान व बालभवनच्या माध्यमातून शेवटच्या घटकांसाठी संघर्ष सुरु असून, या लढ्याला हातभार लावण्याचे काम दरवर्षी मराठी पत्रकार परिषद करत आहे. त्यांची खरी गरज ओळखून त्यांना मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेपासून ते बाल दिनाचे उपक्रम राबविण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली. ॲड. अनुराधा येवले यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
उडान प्रकल्पा मधील स्वयंसेवक पावसाळ्या मध्येही बालविवाह प्रतिबंधासाठी सतत कार्यरत राहून दुचाकीवर विविध ठिकाणी जात असतात. त्याचप्रमाणे झोपडपट्टी भागात मुलांना बालभवनच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य स्वयंसेविका करत आहे. त्यांच्या या कार्यामध्ये पावसाने खंड पडू नये, यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांच्यासाठी रेनकोट व पावसाळी किटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मन्सूर शेख यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कदम यांनी केले. आभार उषा खोलम यांनी मानले.
