जागतिक पर्यटनाला चालणे देणे, 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. जगातील विविध पर्यटन स्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. तसेच या दिवसाद्वारे जगभरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्ये व जागतिक स्तरावर परस्पर समंजसपणाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मदत करू शकते याबद्दल जागरूकता पसरवली जाते. यूनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने 1980 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली.
पर्यटनाच्या बाबतीत विचार करायचा तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्यता आहे. अगदी समुद्रापासून ते हिल स्टेशन पर्यंत, ताजमहालपासून ते चहाच्या मळ्यापर्यंत सर्व प्रकारची पर्यटनस्थळे भारतामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्यही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तर आजच्या ह्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही महाराष्ट्रातील लोकप्रिय अशी यूनेस्को जागतिक वारसा स्थळांची माहिती देणार आहोत.
* अजिंठा लेणी -
अजिंठा लेणी जगभरातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. याठिकाणी इ.स. पूर्व 2 रे शतक ते इ.स. 4 थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या 29 बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून 120 किमी अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ही लेणी स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने 28 एप्रिल, 1819 रोजी लागला. अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणार्या शिल्पकलेचा अद्वितीय अविष्कार पाहायला मिळतो.
* वेरूळ लेणी -
वेरूळची लेणी देखील औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. याठिकाणी सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेणी आहेत.
* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. आकडेवारीनुसार, हे स्टेशन ताजमहाल नंतरचे भारतातील सर्वात जास्त छायाचित्रित स्मारक आहे. 1878 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त हे स्मारक उभारण्यास सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागले. या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी 16 लाख 14 हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते. सीएसटीएमटी स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे.
* एलिफंटा लेणी -
एलिफंटा लेणी ही घारापुरीची लेणी म्हणूनही ओळखली जातात. हे एक बेट असून ते मुंबईपासून 12-15 किमी अंतरावर आहे. या लहान बेटावर डोंगरात ही लेणी कोरली आहेत. ही लेणी भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. ही लेणी साधारण 9 ते 13 वे शतक अशा कालखंडात निर्माण करण्यात आली होती. काही इतिहासतज्ज्ञांच्या मते कोकण मौर्यांनी या एलिफंटा गुफांची निर्मिती केली होती. तर काही तज्ज्ञांच्या मते राष्ट्रकुट आणि चालुक्यांना या गुफांचे श्रेय दिले जाते. एलिफंटाच्या एकूण 7 गुफांपैकी 5 गुफा हिंदू आणि अन्य 2 गुफा बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. एलिफंटा गुफेत हिंदू धर्मातील अनेक देवी देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. 60 हजार वर्ग चौ.मी. क्षेत्रात पसरलेल्या एलिफंटा गुफा पहाडाला कोरून तयार करण्यात आल्या आहेत.
* व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्ब्ल्स -
मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल हे 19 व्या शतकातील व्हिक्टोरियन नियो गॉथिक सार्वजनिक इमारती आणि 20 व्या शतकातील आर्ट डेको इमारतींचा संग्रह असून, तो महाराष्ट्रातील मुंबईच्या फोर्ट परिसरात संग्रह आहे. दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट डेको इमारतींचा हा समूह मियामीनंतर जगातील सर्वात मोठा इमारत समूह आहे. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत व्हिक्टोरियन गॉथिक शैलीचे उत्तम उदाहरण आहे.
* कास पठार -
कास पठार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. पुणे शहरापासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावर हे पठार आहे. कास पठार हे पश्चिम घाटातील जैवविविधता हॉटस्पॉट आहे. या स्थळाला महाराष्ट्रातील ‘फुलांची दरी’ म्हणूनही ओळखले जाते. याठिकाणी दरवर्षी विविधांगी रंगांची फुले फुलतात. कास पठार हा दर दोन आठवड्यांनी आपला रंग बदलतो, कारण सिझननुसार इथली फुले फुलतात, बहरतात. साधारण जूनमध्ये हा सिझन सुरु होतो जो हिवाळ्यापर्यंत चालतो.
