शहरातील जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या रस्त्याच्या खड्डेमुक्तीसाठी न्यायालयाचे आदेश
रस्त्यांसाठी असलेला निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरावा!
सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी दाखल केला होता खाजगी दावा
अहमदनगर - रस्त्यांसाठी असलेला निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरुन शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने अहमदनगर महापालिकेचे आयुक्त व शहर अभियंता यांना दिला आहे. जिव्हाळ्याचा बनलेल्या शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी जिल्हा न्यायालयात महापालिका विरोधात खाजगी दावा दाखल केला होता.

शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले असताना, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असताना, रस्त्यावर करण्यात आलेली पॅचिंग देखील काही दिवसात वाहून गेल्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली. खड्डेमय रस्ता व चिखलामुळे निसरड्या रस्त्यांवर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तर इतरवेळी धुळीच्या त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने भांबरकर यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता.
