गांधीजींच्या विचारां द्वारे विश्वशांतीचा संदेश घेऊन नितीन सोनवणे यांचा सायकल भ्रमंतीतून जगभर प्रसार
रहेमत सुलतान व मखदूम सोसायटीतर्फे नितीन सोनवणे यांचा सन्मान संपन्ननगर-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित विश्वशांती व मैत्री सायकल यात्रेचे भारतात आगमन झाले. 46 देशात 1609 दिवस सायकल प्रवास द्वारे गांधी विचारांचा प्रसार करणाऱ्या राशीन जिल्हा अहमदनगर येथील नितीन सोनवणे यांचा रहमत सुलतान फाउंडेशन व मखदूम सोसायटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूस तांबटकर, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, प्रा.डॉ.कॉ. महेबूब सय्यद, रुग्णमित्र नादिर खान, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, मुस्कान सोशल असोसिएशन चे अध्यक्ष सय्यद शफकत,तनवीर चष्मावाला, तारीक शेख, जावेद मास्टर, शादाब शेख, उर्जिता फाऊंडेशनच्या संध्या मेढे आदी मान्यवर उपस्थित होते.
या यात्रे अंतर्गत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधी भवन) आणि युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते नितीन सोनवणे यांनी 18 नोव्हेंबर 2016 पासून 1609 दिवस अखंड सायकल व पाई प्रवास केला आहे. एकूण 46 देशांमध्ये जाऊन त्यांनी गांधी विचारांचा प्रचार व प्रसार केला.या असामान्य प्रवासाचा अनुभव घेऊन नितीन भारतात आले. गेल्या पाच वर्षात ऊन वारा पाऊस व कोरोणाचीही तमा न बाळगता जगभरातील 46 देशांमधील विविध मधील विविधतेशी समरस होत येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करीत 25 हजार किलोमीटरचा सायकल व पंधरा हजार किलोमीटरचा पायी प्रवास करीत महात्मा गांधी यांचे अहिंसा व शांतीचा संदेश जगात पोहोचविला.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 18 नोव्हेंबर 2016 ला सेवाग्राम वर्धा येथील गांधी आश्रमातून मेकॅनिकल इंजिनिअर आणि गांधी पीस वाॅकर असलेल्या नितीन श्रीरंग सोनवणे यांनी सायकल प्रवास द्वारे शांती यात्रेस सुरुवात केली.
भारता नंतर थायलैंड, कंबोडिया,व्हिएतनाम, चीन,हाॅगकाॅग,मकाऊ, जपान,(टोकियो ते हिरोशिमा पायी चालत) दक्षिण कोरिया, नंतर यूएसए, मेक्सिको, गव्हाटेमाला, होन्डुरास, एल साल्वाडोर, निकाराग्वा, कोस्टारीका,पनामा, कोलंबिया,ईक्वाडोर, आणि पेरु, दक्षिण अमेरिके नंतर नितीन दक्षिण आफ्रिकेत गेला.
दक्षिण आफ्रिका, जिम्बाब्वे, झांबिया, टांझानिया, रवांडा, युगांडा, केनिया, इथिओपिया, सुदान, इजिप्त, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, जॉर्जिया, तुर्की, सर्बिया येथून फिरायला सुरुवात केली. मॅसेडोनिया, अल्बानिया, माँटेनिग्रो, फिरकीझस्तान, उज़्बेकिस्तान, अफगाणिस्तान या देशांमध्ये जाऊन तेथील धार्मिक स्थळे शाळा विद्यापीठ मध्ये शांतता आणि पर्यावरण यावर काम करणारी मंडळी आणि खास करून त्या त्या देशातील लोकांशी संवाद साधत शांतता व अहिंसेचे महत्व पटवून दिले. नितीन दिनांक 18 नोव्हेंबरला 2021 ला जन्मभूमी असलेल्या राशिन जिल्हा अहमदनगर येथे पोहोचले. त्यांच्या कार्याची दखल विविध देशांच्या टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया, आणि ऑनलाइन वृत्त माध्यमांनी घेतली आहे. देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खेचण्याचे लक्षवेधी आणि जागतिक विक्रम करणारे काम नितीन सोनवणे यांनी केले आहे.
