स्वातंत्र्याशी काही संबंध नसलेले आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत.
देशात सध्या देशभक्तीच्या नावाखाली विशिष्ट पद्धतीने उन्माद पसरवला जातोय. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वा चळवळीत काहीही योगदान नसलेली मानसं आणि संस्था आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. देशाच्या ज्या संसदीय वास्तूत हा इतिहास घडला ती ओळख पुसून टाकत तिथे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाला ‘सेन्ट्रल विस्टा’ उभा राहतोय. हे होत असतांना यामागचा विचार काय आहे हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे. आजच्या वातावरणात तरुणांनी खूप विचार करण्याची गरज आहे. दरवर्षी अजून मोठ्या उत्साहात झेंडा फडकावण्याएवजी तरुणांनी विचारांनी लोकशाही रुजवण्याची गरज आहे. असे विचार कॉम्रेड राम बाहेती यांनी न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, मध्ये कॉम्रेड एकनाथराव भागवत यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वाद विवाद व वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावर्षी स्पर्धेचे हे तेहतीसावे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामचंद्र दरेसाहेब यांनी अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड भागवतांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांची आज गरज आहे अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी अ.जि.म.वि.प्र.समाज संस्थेच्या कार्यकारणी सदस्या मा. निर्मलाताई काटे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे. तसेच शेवगाव,पाथर्डी, नगर येथील भागवतांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बी.एच. झावरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. गणेश निमसे यांनी तर आभार डॉ. एस. बी. कळमकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. ई. आठरे हे ही उपस्थित होते.

