गावकऱ्यांच्या श्रमातून उंचखडकची शाळा राज्याच्या नकाशावर :आ.सुरेश धस
अकोले - गावकऱ्यांच्या श्रमातून उभी राहिलेली तालुक्यातील उंचखडक बुद्रुक ची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या वर्गणीतून व श्रमातून उभी राहिली. त्यामुळे ही शाळा राज्याच्या नकाशावर आली असल्याचे गौरवोद्गार आष्टी- पाटोदा मतदार संघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी काढले.
उंचखडक बुद्रुक येथे काळभैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात आ. सुरेश धस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. वैभवराव पिचड होते तर व्यसपीठावर संगमनेर मतदार संघाचे आमदार अमोल खताळ, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, विष्णुपंत चव्हाण, भाऊ खरात, सुनिल दातीर, सुधाकर देशमुख उपस्थित होते.
आ.सुरेश धस यावेळी म्हणाले, मुलांच्या आयुष्याचा पहिला पाया हा जिल्हा परिषद शाळेतून घडतो.जगायचे कसे हे शाळाच शिकविते म्हणून तर सर्वाधिक आयएएस व आयपीएस अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतून घडतात. मंदिर, यात्रा आणि सप्ताह यांना लाख आणि कोटीत वर्गणी मिळते, परंतु शाळेला पाहिजे तेवढी मदत मिळत नाही. मात्र उंचखडक बुद्रुक शाळेसाठी गावकर्यांनी लाखो रुपयांची वर्गणी जमा करुन शाळा महाराष्ट्राच्या नकाशावर नेली आहे. म्हणून जेवढं मंदिराला भजले जाते, तितकेच जिल्हा परिषदेच्या शाळांना देखील महत्व दिले गेले पाहिजे असे ते म्हणाले.
उंचखडक बुद्रुक हे एक आदर्श गाव आहे. येथे प्रभुरामचंद्रांचे वास्तव्य लाभले आहे. गावातून अनेक मुले स्पर्धा परिक्षेतून यशस्वी झाले आहेत.गावची शाळा, मंदिरे व शेती उन्नत झाली आहे. हजारोंच्या संख्येची उपस्थिती पाहून गावचा एकोपा दिसतो आहे. त्यामुळे काळभैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने जो यशस्वी विद्याथ, उद्योजक, व्यावसायिक यांचा सन्मान केला तो एक आदर्श उपक्रम आहे.
ज्या ज्या व्यक्तींचा सन्मान झाला ते सर्व जिल्हा परिषद शाळेतून शिकून मोठे झाले आहेत.त्यामुळे प्रत्येकाने मराठी शाळा आणि आपली मातृभाषा जपली पाहिजे असे सांगून आमदार धस म्हणाले,आजकाल इंग्रजी माध्यमांचे फॅड सुरु आहे.कोणीही उठून इंग्रजी शाळा काढू लागले आहे. कसलीही परवानगी नाही की सुविधा नाही. एक टमटम घ्यायची आणि त्यात मुलं कोंबायची, सुटाबुटात मुलं, रेन रेन कम अगेन म्हटलं की झाले इंग्लिश मीडियमचे मुलं. आई- बाप काबाड कष्ट करुन त्यांची फी भरतात.अवघ्या दहा ते बारा हजार रुपयांवर काम करणारा शिक्षक त्या मुलांना काय शिकवणार आहे? त्यामुळे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे हे पालकांनी समजून घेतले पाहिजे असेही ते म्हणाले.यावेळी सायंकाळी 4 वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी अंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू पदक विजेते तान्हाजी नरके, बबलु धुमाळ, बाबासाहेब नाईकवाडी यांनी अथक परिश्र्म घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. सागर शिंदे, सोपान देशमुख, आबासाहेब मंडलिक, संदिप दातखिळे, राहुल देशमुख, शैलेश देशमुख, विजय देशमुख, विशाल देशमुख, सागर देशमुख, महेश खरात, रविंद्र देशमुख, अनिल देशमुख, विकास खरात, निखील खरात, महेश जेजुरकर, तुषार देशमुख, प्रतिक मंडलिक, भाऊसाहेब देशमुख, रवि रुपवते, श्यामराव देशमुख, अमोल शिंदे, गणेश खरात, अक्षय देशमुख यांच्यासह काळभैरवनाथ यात्रा कमिटीच्या सर्व आयोजकांनी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविक ॲड. सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सोपान देशमुख यांनी केले तर आभार भाऊ खरात यांनी मानले.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलतांना ते म्हणाले की, घटनेनंतर देशमुख कुटुंबाला भेट दिली होती. तेथे संतोषला कसे मारले याचे वर्णन तेथे मी ऐकले आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. तेव्हाच मी ठरविले होते की काय होईल ते होईल पण ही गुन्हेगारी प्रवृत्ती येथेच गाडली पाहिजे. तेव्हा हा लढा तीव्र झाला आणि तो जनतेने हाती घेतला. संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी अखेरच्या घटकापर्यंत संघर्ष करत राहणार आहे असे आ.धस यावेळी म्हणाले.

