मख़दुम सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशन तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
नगर - भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला.त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासना पुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं.
अहिल्यादेवी होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक न्यायप्रिय नेत्या, समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे.असे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले.
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशन तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, एडवोकेट हनीफ बाबूजी, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे आसिफ दुलेखान, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरूर, उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, राजाभय्या, जावेद मास्टर, अबरार शेख आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.कमर सुरुर व संध्याताई मेढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार आरिफ सय्यद यांनी मांनले. कार्यक्रमास मखदूम सोसायटी, रहमत सुलतान फाउंडेशन व अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ आदींचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

